नीलिमा कढे | मिळून सार्याजणी, ऑगस्ट २००९

या सृष्टीतल्या प्रत्येक वस्तुमात्राने आपापला वैशिष्ट्यपूर्ण असा आकार धारण केला आहे. महाकाय पर्वत, मोठमोठ्या दगडी शिळा…अवकाश व्यापून आपल्या जागीच घट्ट रोवून उभे आकार भक्कमपणाची, जडतेची संवेदना निर्माण करतात. तर आकाशात हलके, तरंगते, दरक्षणी रूप बदलते ढगांचे आकार आपल्या मनात तरल संवेदना जागवतात. संगीतकाराचा कान जसा कोलाहलातही नादमय मधुर स्वर शोधत असतो. तसाच चित्रकार किंवा शिल्पकाराचा डोळा आकार रंग रेषांमधून व्यक्त होणाऱ्या संवेदना शोधत फिरत असतो. आकारांमध्ये रमणाऱ्या अशा एका वेड्याला भेटायचं असेल तर मुंबई-गोवा रोडवर इंदापूरला राजेश कुळकर्णींच्या `आकार पॉट आर्ट’ या पॉटरी स्टुडिओला जरूर भेट द्यायला हवी.
इंदापूर एस. टी. स्टँडच्या मागच्या रस्त्यावर `आकार पॉट आर्ट’ च्या गेटमधून आत गेल्यावर आपण एका वेगळयाच विश्वात प्रवेश करतो. कुंभाराच्या चाकावर केलेली लहानमोठी, वेगवेगळया घाटाची भांडी आणि त्याच मातीपासून बनवलेल्या पेन स्टँड्स्,घड्याळं, वॉल हँगिंग्ज अशा कलात्मक रूप घेतलेल्या इतर अनेक वस्तू बघण्यात आपली दृष्टी गुंतून जाते. या वस्तूंवरच्या वेगवेगळया टेक्सचर्समुळे नकळत त्यांना स्पर्श करून आपण त्या कधी हाताळायला घेतल्या ते कळतच नाही. स्टुडिओला भेट द्यायला येणाऱ्या रसिकाला या सुबक वस्तू सहज हाताळून पाहाता येतील अशाच रीतीने, साध्याशा मांडण्यांमध्ये त्या मांडून ठेवल्या आहेत.
साधी मातीची भांडी! पण त्यात किती वैविध्य! बसकी गोलाकार, उंच निमुळती, कलती, जाळीदार नक्षी असलेली! कुंभाराची भांडी म्हटल्यावर आपल्या डोळयांपुढे सहज येतात पाणी पिण्याचे माठ, मडकी, किंवा पणत्या आणि झाडं लावायच्या कुंड्या! पण याच मातीतून एखादा कलाकार अप्रतिम घाट आणि घाटातली लय निर्माण करतो. अशा भांड्यात काही ठेवण्यापेक्षा हे भांडे म्हणजे स्वतंत्र कलाकृती असल्याचा प्रत्यय येतो आणि तिच्या कलात्मक आकृतिबंधात आपली दृष्टी गुंतून राहाते. मातीतून अशा कलात्मक वस्तू तयार करणारे एक कलावंत म्हणजे राजेश कुलकर्णी. त्यांच्या टेराकोट्टा आर्टिकल्सच्या (भट्टीत भाजून पक्क्या केलेल्या मातीच्या वस्तू) स्टुडिओत जाऊन त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली की जाणवतं, मातीला आकार देतानाच त्यांनी स्वत:च्या आणि स्टुडिओशी संबंधित इतर अनेक व्यक्तिमत्त्वांनाही आकार देण्याचं काम आरंभलंय.
आकार स्टुडिओचं स्वप्न् साकारणाऱ्या राजेश कुळकर्णींचं व्यक्तिमत्त्व म्हणजे वेगवेगळया पैलूंची सरमिसळ आहे. शिक्षण संपवून `आकार’ सुरू करेपर्यंतचा त्यांचा प्रवासही पाहाण्यासारखाच आहे.
राजेशचं शिक्षण सुरू असताना त्याच्या वडलांकडे पेण आणि इंदापूरचं एस. टी. क्रॅन्टीनचं कॉन्ट्न्ॅक्ट होतं. घरची बाग-शेती असं व्यवसायाचं वातावरण होतं. त्याला वैचारिक वाङ्मय वाचनाची प्रचंड आवड! कलात्मक संवेदनक्षमता लाभलेलं मन, वाचनातून जागं झालेलं सामाजिक भान, गांधीजींच्या स्वयंपूर्ण खेड्याची कल्पना डोक्यात रुतलेली, अनिल अवचटांचं `माणसं’ वाचून मनात निर्माण झालेली अस्वस्थता, रेणू दांडेकर – अभय बंग सारख्यांच्या सामाजिक सेवेतून निर्माण झालेले आदर्श, आपण निवडलेल्या व्यवसायातून आपल्याबरोबर गावाचं हित साधता येईल का असा पडलेला प्रश्न!
मनात हे मंथन चालू असतानाच घरच्या व्यवसायाची जबाबदारी अंगावर येऊन पडल्याने राजेश शिक्षण सोडून बसला होता. कलाक्षेत्रातलं शिक्षण घेऊन त्यातच व्यवसाय करायचा या इच्छेने त्याने `ठाणे स्कूल ऑफ आर्ट’ मध्ये प्रवेश घेतला. पण फाउंडेशनचं एकच वर्ष जेमतेम पूर्ण केलं आणि पेणचं एस्. टी. क्रॅन्टीन चालवण्यासाठी त्याला परत यावं लागलं. आतला कलावंत – विचारवंत स्वस्थ बसू देत नव्हता. रंगरेषांचं जग खुणावत असताना, पुढची स्वप्नं पाहात राजेश प्रत्यक्षात मात्र मुंबई-गोवा मार्गावर `प्रतीक’ ढाबा चालवत होता. घरात आई-वडलांचे स्वाभाविक उत्तम संस्कार आणि वाचनातून घडलेली वैचारिक बैठक यातून निर्माण झालेली व्यावसायिक निष्ठा आता त्याच्या दैनंदिन जीवनात उमटू लागली. प्रत्येक पायरीवर संयोजनामागचा विचार महत्त्वाचा वाटू लागला. वेटर्सच्या ड्युटीज लावताना किचनमधले रोलिंग सांभाळताना आधी पेपरवर प्लॅनिंग होऊ लागले. `प्रतीक’च्या माध्यमातून वेटर्सचे जीवनमान उंचावण्यासाठी काही करता येईल का याचा विचार सुरू झाला. नोकरी करूनच एकीकडे अभ्यास करून शिक्षण पूर्ण करण्याचा कमाईतून नेमाने बचत करण्यासाठी राजेशने आग्रह धरला. वेटर्स म्हणून काम करणारी जवळपासच्या गावातलीच मुलं होती. त्यांच्यासाठी ..ड्युटीजच्या मध्ये विश्रांती घेण्यासाठी प्रतीकवर पोटमाळा निघाला. तिथे वाचनालय आले. गिऱ्हाइकांची गर्दी होण्याच्या ठरावीक वेळा लक्षात आल्यावर त्या वेळात कोणत्या वेटरने, कोणत्या टेबलावर नेमके कुठून कसे जायचे हे दर्शवण्यासाठी कागदावर रंगीत पेनांनी रेषा ओढल्या गेल्या. सहसा `मेस’ स्वरूपात असलेलं किचन – चकचकीत स्वच्छ कसं राहील, एकमेकांना अडथळा न येता हालचाली सहज, सोप्या कशा होतील याचा विचार सुरू झाला. म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जो मुद्दाम शिकवला जातो तो संयोजनाचा भाग सांभाळणे आणि प्रतीकच्या छत्राखालच्या घटकांचे स्थैर्य, विकास यासाठी काही विशेष संधी निर्माण करणे अशा दुहेरी पातळीवर राजेशचे काम सुरू झाले. त्याचे फळ म्हणून `प्रतीक’ तुफान चालू लागले. व्यावसायिक यश वाढावे या हेतूने त्याचे रूपांतर आता `बार रेस्टॉरंट’ मध्ये केले. पण त्यामुळे `राजेश शेट’ चे प्रश्नही वाढले. लोकांना दारू पाजून अधिकाधिक पैसा कमावणे त्याच्या बुद्धीला पटेना! अनेकदा बार रेस्टॉरंट चालवताना ज्यात पळवाटा काढल्या जातात ते सर्व नियम नीट पाळून हा बार चालवत होता, पण तरी जवळपासच्या कॉलेजचे विद्यार्थी बारमध्ये बसून वेळ आणि पैसा फुकट घालवतात या विचाराने तो अस्वस्थ होऊ लागला. मुलांना समजावून पाहिलं, शेवटी कॉलेजच्या प्राचार्यांना भेटून `व्यसनमुक्तीवर काही व्याख्यानं आयोजित करू या का?” अशी ऑफर राजेशने दिली. असा हा बारचा मालक हळू हळू हॉटेल व्यवसाय सोडून काही कलात्मक व्यवसाय करता येईल का हा विचार सतत मनात बाळगून होता.
मग हॉटेलच्या जोडीने नर्सरीचे वेड डोक्यात घुसले. झाले गार्डनिंगची पुस्तकं ढिगाने घरी आली. नवे प्रयोग सुरू झाले. जोडीला शेतकी शिक्षण घेतलेला भाऊ संदेश होताच, प्रत्येक छोट्या रोपापासून सर्वांची बोटॅनिकल नावं, लोकल नावं, त्यांची खतं बियाणी यांची पुरेपूर माहिती राजेशच्या ओठावर खेळू लागली. कोणत्या रोपाला किती पाणी लागतं, कसं हवामान लागतं, आपल्याच कल्पनेतून साकारलेले इरिगेशनचे प्रयोग यात राजेश रमला. प्रतीक नर्सरी त्याची नवी प्रयोगशाळा झाली. पण तरी अजूनही रंगरेषांचं जग खुणावत होतं. त्याच्याच शब्दात सांगायचं तर `ठाणे स्कूल ऑफ आर्ट’ मध्ये एका वर्षाचे कलेचे जे संस्कार झाले त्याच्याशी निगडित व्यवसाय सापडेपर्यंत चैन पडत नव्हतं. शिवाय या कलात्मक व्यवसायात इंदापूरमधल्या सुप्त कलावंतांनाही सामावून घेता येईल का? अशा विचारमंथनातून राजेश हळूहळू लुप्त होत चाललेल्या पारंपरिक `कुंभारकले’पर्यंत पोहोचला. डोक्यात निर्णय झाल्यावर `राजेश शेट’ जीप घेऊन इचलकरंजीला पोहोचले तिथे इलेक्टि्क व्हील मिळतं असं समजलं होतं. व्हील विकत घेऊन पहिला फोन `ठाणे स्कूल ऑफ आर्ट’ ला केला आणि कलात्मक पॉटरीचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घोषित केला. त्यानिमित्ताने नोकरीसाठी शहरांमध्ये स्थलांतरित होणाऱ्या स्थानिक कुंभारांना गावातच व्यवसायाची संधी मिळावी, आर्थिक विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेत आपला हातभार लागावा असा सामाजिक हेतूही राजेशच्या मनात होता.
घरातल्या सर्वांनी साशंकतेने का होईना पण राजेशला पाठिंबा दिला. कारण यात घातलेला भांडवली खर्च आणि झालेली प्राप्ती यांचं प्रमाण अर्थातच `प्रतीक’ हॉटेलशी तुलना न करता येणारं होतं. या व्यवसायात आर्थिक यश दिसायला बराच काळ थांबायला लागणार होतं. या दरम्यानच्या काळात पुण्यात वाढलेल्या-वावरलेल्या वैशालीने राजेशवर विश्वास दाखवून त्याला कायमची साथ द्यायची तयारी दर्शविली. घरच्या अशा भक्कम मानसिक पाठिंब्यावर राजेशने या क्षेत्रात प्रयोग करायला सुरुवात केली. आता तो गेला महाभारतातल्या एकलव्याच्या भूमिकेमध्ये. कारण पॉटरीचं औपचारिक शिक्षण घेतलं नव्हतं. मग एकलव्याप्रमाणे स्वबळावर ज्ञान मिळवणं सुरू झालं. जागतिक दर्जाची पॉटरीवरची पुस्तकं, पॉटरीच्या स्टुडिओजना भेटी देणं, इंटरनेट आणि तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा हे झाले माहितीचे स्त्रोत. दरम्यान `ठाणे स्कूल ऑफ आर्ट’शी संलग्नतेतून येऊर-ठाणे इथे एक पॉटरी वर्कशॉप आयोजित केलं. तेव्हा `जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’चे कुंभारसर मार्गदर्शक तज्ज्ञ म्हणून आले होते. त्यांनी दाखवलेली प्रात्यक्षिके जमवलेली माहिती आणि स्वत: केलेले प्रयोग यातून आता तंत्र जमू लागलं. व्हीलवर राजेशचं भांडं सहज उचललं जाऊ लागलं. तांत्रिक सफाई साध्य करण्यासाठी आवश्यक ती बुद्धी आणि कौशल्य राजेशकडे होतंच. आता पुढची पायरी होती भट्टीत भांडी भाजण्याची!
पुस्तके वाचून तात्पुरती विटांची भट्टी उभारली. स्वत: तयार केलेली दोनशे मातीची भांडी त्यात रचली. भट्टी जसजशी गरम होत गेली तसे `फट् फट्’ आवाज होऊ लागले. १९६ भांडी भट्टीत फुटली आणि चारच वाचली! तेव्हा हे टेराकोट्टा माध्यम कसे चकवणारे आहे याची राजेशला कल्पना आली आणि गावातल्या लोकांची खात्री पटली की `राजेश शेट’ चांगला चाललेला व्यवसाय सोडून मातीशी खेळण्याचं ठरवतायत तेव्हा व्यवसाय मातीतच घालवायचा यांचा विचार दिसतोय!’
पण अशा प्राथमिक पराभवांची जंत्री राजेश हसतच स्वीकारत राहिला कारण या माध्यमाची ताकद तो जाणून होता. या काळात सिरॅमिक पॉटरी विषयात लंडनमधे डॉक्टरेट केलेल्या डॉ. आनंद ढवळे सरांची खूप मदत झाली. या एकलव्याचे गुरू एकच व्यास नव्हते तर तज्ज्ञ व्यक्ती, संस्था, उपक्रम, पुस्तकं यांना गुरू मानून त्याची साधना सुरू होती. या सगळयांकडून शिकत शिकत तांत्रिक प्रगतीची एक एक पायरी राजेश चढत गेला.
इंदापूरमधली १०/१२ मुलं आता राजेशला सहायक म्हणून मिळाली. अंगात कलेची हुनर असूनही संधी अभावी निमूट राहिलेल्या या मुलांना आकार पॉट आर्टमुळे अर्थार्जनाची संधी मिळाली. या मुलांच्या निमित्ताने राजेशला वेगळं क्षितिज खुणावू लागलं. निव्वळ नफ्याचे गणित मांडणे हा राजेशचा व्यवसायामागचा हेतू कधीच नव्हता. `आकार’च्या माध्यमातून या मुलांचे व्यक्तिमत्त्व घडावे यासाठी राजेशचे प्रयत्न सुरू झाले. संधीअभावी सुप्त राहिलेले कलागुण, शिक्षणाअभावी विचारप्रक्रिया खुंटलेली. सगळयाच अभावग्रस्त परिस्थितीमुळे आपण काही व्यक्त करू शकतो, याचंच विस्मरण झालेलं! त्यांच्यासाठी राजेशने वेगवेगळे उपक्रम सुरू केले. त्यांना सर्वप्रथम पुस्तकं वाचण्यासाठी प्रोत्साहन देऊन पाहिलं! पण प्रतिसाद मिळेना. मग वर्किंग टाईम सोडून सर्वांना गोलाकार बसवून पुस्तकाचं अभिवाचन सुरू केलं आणि एक दिवस नुसत्या गप्पा. यातून संवाद सुरू झाला. एकमेकांचे अनुभव समोर येऊ लागले. एखादा सांगे, माझी बहीण अमुक एका गावात दिली!’ मग चर्चेला सुरुवात होई. राजेश विचारे `दिली’ हा शब्द आपण सहज वापरतो. पण तुम्ही विचार केलाय का? देऊन टाकायला तुझी बहीण म्हणजे एखादी वस्तू आहे का?’ मग स्त्रियाचं समाजातलं स्थान एकूणच अंधश्रद्धा, शिक्षणाअभावी खुंटलेला खेड्यातल्या तरुणांचा विकास अशा विषयांवर मंथन होई. काही वेळा जोडीला राजेशने बोलावलेले पाहुणे असत. हाइकिंग-ट्न्ेिंकग, कराटे शिक्षण असे शारीरिक उपक्रम सुरू केले. नाट्य, काव्यवाचन करणारे कलावंत `आकार’वर येऊ लागले. नृत्यप्रात्यक्षिकातून नृत्याचे रसग्रहण कसे करावे, चांगल्या फिल्मस् पाहाणे, संगीत ऐकणे याचे अनुभव मिळू लागले. या देवाणघेवाणीतून गणपत छान लिखाण करू लागला. `आकार’मध्ये आलेल्या पाहुण्यांना उपक्रमाची माहिती देणे. पॉटरीचे प्रात्यक्षिक देणे यात निलेश तरबेज झाला. इन्स्टॉलमेंटने मोटारसायकल घेण्यास मुलांना प्रोत्साहन दिले.
आर्थिक स्वावलंबनानंतर आपणही काही समाजाचे देणे द्यावे या हेतूने पुण्यातील डॉ. अभिजित वैद्य यांच्या आरोग्यसेनेचे ट्निग या मुलांनी घेतले. गावात तापाची साथ आल्यावर रोग्यांची प्राथमिक सेवा केली. गावात हॉस्पिटल नसल्याने मंदिरात रोगी अॅडमिट केले. भूकंप, पूरस्थिती अशा आपत्कालात ठिकाठिकाणी उभारलेल्या आरोग्यसेवेत १० दिवस सेवा केली. या सगळया उपक्रमांमधून आता यांना स्वत:चे व्यक्तिमत्त्व मिळाल्याने त्यांच्यात जागा झालेला आत्मविश्वास आपल्याला जाणवतो. यातील काहींनी बाहेर पडून नोकरी करण्याची, वेगळा व्यवसाय करण्याची तयारी दाखवली. त्यांनाही राजेशने लागेल ती मदत केली.
आकार पॉट आर्टमधल्या वस्तूनिर्मितीचा दर्जा हळूहळू उंचावत गेला. तंत्राचे बारकावे लक्षात येऊन त्यावर प्रभुत्व मिळाले. सिरॅमिकच्या वस्तू तयार करताना लागणारी माती विशेष कष्ट घेऊन दीर्घकाळ संस्कार करून तयार केली जाते. वस्तू बनवताना हातात आलेली लोण्याहून मऊ अशी माती कमीत कमी २ वर्षांपासून बनवायला सुरुवात झालेली असते. ६ महिन्यापर्यंत पाण्याखाली कुजवणे, सुकवून दळणे, विशिष्ट गुणधर्मासाठी वेगवेगळया मातींचे मिश्रण करणे, माती मळून ती मुरवण्यासाठी ठेवणे अशा दीर्घ प्रक्रियेनंतर ती वापरता येते. भट्टीत भाजण्याचे तंत्रही गुंतागुंतीचे आहे. त्याचे तापमान जराही कमी किंवा जास्त होऊन चालत नाही. अन्यथा केलेली भांडी फुटून जातात, काळी होतात, त्यावर फोड होतात. त्यामुळे फायनल प्रॉडक्ट हातात येईपर्यंत धीर धरावा लागतो. हे तंत्र शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना `आकार’मध्ये राहून हे तंत्र शिकण्याची प्राथमिक सोयही आता राजेशने केली आहे. छोट्या वस्तूंपासून मोठ्या म्युरल्सपर्यंत निर्मितीमध्ये भर पडत आहे. सोमैय्या कल्लप्पा या सुप्रसिद्ध आर्किटेक्ट कंपनीतर्फे नुकतेच त्याने इंदौरमध्ये एक ९ फूट ५ फूट चे टेराकोट्टा म्युरल तयार केलेय.
`आकार’च्या निमित्ताने प्रभावित झालेले खूपसे रसिक आता इथे भेट द्यायला येतात. जे भेट देतात ते `आकार’चे वातावरण आणि राजेशच्या प्रेमात पडतात. पुन्हा पुन्हा येत राहतात. नाट्य, चित्रपट, साहित्य, डॉक्टर्स, आर्किटेक्ट, मानसशास्त्र अशा वेगवेगळया क्षेत्रातील रसिक विचारवंतांशी आता राजेशची मैत्री आहे. या वर्षी मुंबईच्या `काला घोडा’ फेस्टिव्हलमधल्या राजेशच्या स्टॉलला चांगली रसिकमान्यता मिळाली.
माती, पाणी, उजेड, वारा अशा पंचतत्त्वांची मिळणीजुळणी करून नवेच विश्व `आकारित’ करणाऱ्या या पॉटरी स्टुडिओला आणि त्याच्या निर्मात्याला एकदा तरी भेटलेच पाहिजे आणि तिथल्या कलाकृतींचा आस्वाद घेतला पाहिजे.
